काळे कुलवृत्तान्त

 

 

 




 


वत्स गोत्री काळे-कुलासंबंधी सामान्य माहिती  (प्रथम आवृत्ती सन 1944)
प्रास्ताविक

 

आपण कोण व कोठून आलों हे जाणण्याचें स्वाभाविक कुतुहल मनुष्यमात्रांत असतें.  पूर्वजांचें स्मरण ठेवण्याकरिंतां कोणी श्राध्द करतो, कोणी त्यांचें नाव आपल्या वास्तूस देतो किंवा सार्वजनिक कार्यास नाव चालविण्याच्या अटीवर देणगी देऊन तें स्मरणांत राहण्याची व्यवस्था करतो.  कुलवृत्तान्त-प्रकाशन हा याच वर्गांतील एक प्रयत्न आहे.  आजपर्यंत महाराष्ट्रांत सुमारें पंचवीस कुलवृत्तान्त प्रसिध्द झाले आहेत व पांचसात कुलवृत्तान्तांचे काम सध्यां चालू आहे, त्यामुळें वृत्तान्ताचे कार्य लोकांच्या नजरेसमोर आलेलें आहे.  लोकमान्य टिळक, डॉ. सर रघुनाथराव परांजपे, रियासतकार रावबहादूर सरदेसाई, इत्यादि निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रसिध्द व्यक्तींनीं या कार्याचे उपयुक्ततेविषयीं अनुकूल अभिप्राय व्यक्त केलेले आहेत.  यामुळें कुलवृत्तान्त प्रसिध्द करण्याचें प्रयोजन काय याचा ऊहापोह करण्याचें आता कारण उरले नाही.
                    इ. स. 1941 त सोलापुरास भरलेल्या अखिल चित्पावन ब्राह्मण परिषदेंत केसरीचे संपादक रा. ज. स. करंदीकर यांनी पुढील प्रस्ताव मांडिला व तो सर्वांनुमतें संमत झाला;   यावरून या कार्याची उपयुक्तता सर्वांस पटली आहे असे मानण्यास हरकत नाही.
                    "आतांपर्यंत ज्या चित्पावन घराण्यांच्या प्रमुख व्यक्तींनीं पुढाकार घेऊन आपल्या घराण्याचे कुलवृत्तान्त प्रसिध्द केले त्यांच्या त्या समाजसेवेबद्दल ही परिषद त्या व्यक्तींचें हार्दिक अभिनंदन करते.  आणि इतर घराण्यांच्या पुढार्‍यांनां अशी सूचना करते कीं, त्यांनींही आपआपल्या घराण्यांचे कुलवृत्तान्त शक्य तितक्या लवकर प्रसिध्द करून अखिल चित्पावनांचा संकलत इतिहास समाजाला लाभेल अशी तजवीज करावी."

भृगुकुल

 काळे हे उपनाव महाराष्ट्रातील चित्त्पावन ब्राम्हण पोटजातीत आहे. तसेच ब्राह्मणांच्या इतर पोटजातीत नि ब्राह्मणेतरही आहे. चित्पावनात काळे हे तीन गोत्रांचे आढळतात - वत्स, शांडिल्य व गार्ग्य.  प्रस्तुत वृत्तांत वत्स गोत्र असणाऱ्या काळ्यांचा आहे.  चित्तपावनात चवदा गोत्रे आहेत.  गोत्रप्रवर्तक सात ऋषि असल्यामुळें ही चवदा गोत्रें पुढील सात गटांत, विभागलीं गेलीं आहेत. (1) कश्यप, (2) भरद्वाज, (3) वसिष्ठ, (4) विश्वामित्र, (5) भृगु, (6) अंगिरस, (7) अत्रि.  वत्स गोत्र हे भृगु गटांतील आहे.  या गटांतील दुसरें गोत्र चित्तपावनांत जामदग्न्य आहे.  वत्स-गोत्रीय काळे पंचप्रवरी व त्रिप्रवरी आहेत. हे प्रवर भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व, व जामदग्न्य हे होत.  तीन प्रवर असणारे काळे यांतील पहिले तीन प्रवर म्हणतात.  प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे.  पूर्वः प्रवरः उत्पादयितुः उत्तरः प्रतिग्रहीतुः प्रवरांतील पहिले ऋषि प्रवराचे उत्पादक व त्यापुढील ऋषि ती परंपरा स्विकारणारे ऋषि होत असा याचा अर्थ आहे.  कांही गोत्रांत प्रवर एक असल्याचा व क्वचित् दोन असल्याचाही उल्लेख आढळतो.  प्रवर चार असत नाहीत व पांचांपेक्षां अधिक असत नाहीत.
                    गोत्रप्रवर्तक ऋषि यांचें नाव त्यांच्या प्रवरांत असतेंच असे नाही.  चवदा गोत्रांपैकीं वत्स, कपि, नित्युनंदन, बाभ्रव्य, विष्णुवृध्द या गोत्रांच्या प्रवरांत गोत्रप्रवर्तक ऋषिंचा नामनिर्देश नाही.  जामदग्न्य व वत्स या दोन गोत्रांचे प्रवर एकच आहेत.  सप्रवर विवाह शास्त्रनिषिध्द असल्यामुळें या दोन गोत्रांत विवाह संबंध होत नाहीत.
                    भृगुकुलांत या पंचप्रवरांची 92 गोत्रें व भार्गव, च्यावन, आप्नवान या त्रिप्रवरांचीं नऊ गोत्रें असून शिवाय इतर प्रवरांची अनेक गोत्रें असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो.  देवरूखे व देशस्थ यांत शौनक, भार्गव, कुत्स इत्यादि भृगुकुलांतील गोत्रांचे लोक आहेत.  वत्सगोत्रीय काळे आश्वलायन सूत्राचे आहेत.
भृगुंचे एकंदर पांच गण आहेत ते :-

जामदग्न्या वीतहव्यास्तथा गार्त्समदा अपि |
वाध्ऱ्यस्वाश्चैव वैन्याश्च भृगोः पंचगणाः स्मृताः | 
                    यावरून असे दिसतें कीं, वत्सांचा स्वतंत्र गण नाही.  जमदग्निगणांत त्यांचा समावेश होतो.  उ. "वत्सा विदा आर्ष्टिषेणा इत्येते जमदग्नयः' कोणाही व्यक्तीस आपल्या पूर्वजांबद्दल शक्य तितक्या जास्त माहितीची जिज्ञासा साहजिकच असणार, म्हणून काळे यांच्या या पांच प्रवरकार पूर्वजांबद्दल उपलब्ध असलेली माहिती पुढे दिली आहे.  ही माहिती वेद व पुराणें यांतील म्हणजे फार जुन्या काळांतील आहे.  त्या काळीं एकाच नावाच्या अनेक व्यक्ति असण्याचा संभव असल्यामुळें एका व्यक्तीची माहिती दुसऱ्या व्यक्तीच्या माहितीत मिसळली गेली असल्याचा संभव आहे हे ध्यानांत येईलच.  ही माहिती पेंडसे-कुल-वृत्तान्ताचे आधारें दिली आहे.
भृगु -- भृगुंना अग्नि प्रथम सांपडला.  भृगु हे अनेक दिसतात.  प्रजापती-पासून भृगु, अंगिरस व आदित्य उत्पन्न झाले.  कोणी म्हणतात वरूणापासून झाले व म्हणून वारूणि भृगु असे म्हणतात.
  1. स्वायंभुव मन्वंतरांत हा स्वायंभुव मनूचा जांवई व शंकराचा साडू होय. दक्षकन्या ख्याति ही याची बायको.  विष्णूच्या छातीवर याने लाथ मारिली.  ही लाथ विष्णूने श्रीवत्स चिन्ह म्हणून धारण केली.
  2. वैवस्वत मन्वंतरांत हा वरूणापासून झाला.  याने नहुषास शाप देऊन इंद्रापासून च्युत केलें.  याला संजीवनी विद्या येत होती.  याने जमदग्नीस पुनः जिवंत केलें.  हा गोत्रकार आणि मंत्रकारही आहे.  भृगुला दिव्या व पौलोमी अशा दोन स्त्रिया होत्या.  पौलोमीला च्यवन  झाला.  च्यवनाला सुकन्येपासून आप्नवान व आप्नवानाला नाहुषीपासून और्व  झाला.  अशा क्रमाने हजारों भार्गव व परशुराम इत्यादि उत्पन्न झाले.    याच्या नावावरील ग्रंथ :- भुगुस्मृति, भृगुगीता, भृगुसंहिता, भृगुसिध्दांत व भृगुसूत्र. याने  वास्तुशास्त्रावर ग्रंथ केला आहे.
भार्गव -- हे एका कुलाचें नाव आहे.  च्यवन, गृत्समद इत्यादिकांचें हे कुलनाम आढळतें.  सध्यां भार्गव नावाचे ब्राह्मण भडोचला आहेत.  त्यांनीं परशुरामाने निःक्षत्रिय पृथ्वी केल्यानंतर त्याला अवभृथ स्नानाचा संकल्प सांगितला होता.
च्यवन -- ऋग्वेदांत याला च्यवान असे म्हटलें आहे.  याला सर्वानुक्रमणीनें भार्गव म्हटलें आहे, हा भृगुचा पुत्रही आहे.  हा अश्वींचा उपासक होता, म्हणून याला अश्वींनीं म्हातारपणीं तारूण्य व सुंदर स्त्री दिली.  गांवाच्या बाहेर असलेल्या जख्खड व भेसूर दिसणाऱ्या याला, पोरांनी धोंडे मारिले, इत्यादि गोष्ट पुराणांप्रमाणेंच ब्राह्मणग्रंथातही आढळते.  येथें याला दाधीच म्हटलें आहे.  हा सामांचा द्रष्टा आहे.
                        भृगु ऋषीची भार्या पुलोमा.  तिच्या उदरीं भृगुवीर्यापासून गर्भसंभव झाला.  भृगु ऋषि जलाशयावर स्नानास गेला असतां त्याच्या आश्रमांत पुलोम नावाचा एक राक्षस आला.  त्याने भृगुपत्नींचें रूप पाहून तिला पळविलें.  त्या राक्षसाला दमन असे म्हटलें आहे.  ती त्याच्या भीतीमुळें वाटेंतच प्रसवली, म्हणून त्या बालकास च्यवन असे नाव प्राप्त झालें.  नंतर त्या च्यवनाच्या दिव्य तेजाने तो राक्षस जळून खाक झाला व पुलोमा, च्यवनाला घेऊन आश्रमीं परत आली.  हा वेदवेदान्तांत अतिशय निष्णात होता.  याने अतिशय मोठी तपश्चर्या केली.  तपश्चर्या करीत असतां याच्या अंगावर एक वारूळ वाढलें, तरी याला त्याचा पत्ताच नव्हता.  त्याच रानांत राजा शर्याति आपल्या परिवारासह क्रिडा करण्याकरिंतां आला असतां त्याची रूपवती मुलगी सुकन्या ही आपल्या सख्यांसह फिरत फिरत त्या वारूळापाशीं आली.  तोंच, तिला आंत कांही तरी चकाकत आहेसे दिसले.  तेव्हां तिने तें काय आहे हे पाहाण्याकरितां आंतील त्या चकचकीत पदार्थास कांट्याने टोंचलें.  त्यामुळें या ऋषीचे डोळे फुटले.  तेव्हां याने अतिशय संतप्त होऊन सर्व सेनेसह राजाचा मलमूत्रावरोध केल्यामुळें तो राजा हात जोडून च्यवनास शरण आला.  च्यवनाने `तुझी मुलगी मला दे` असे सांगितलें.  राजा या गोष्टीस कबूल झाला व सुकन्येचें वृध्द च्यवनाबरोबर लग्न झालें.  नंतर ती त्याच रानांत आपल्या भर्त्यासमवेत राहात असतां एके दिवशीं अश्विनीकुमारांनीं तिला पाहिलें व आमच्याबरोबर चल, असे ते म्हणाले.  पण तिने आपल्या पातिव्रत्याने त्यांस दिपवून आपल्या नवऱ्यास तारुण्य द्या असे ती त्याना म्हणाली.  नंतर च्यवन हा अश्विनीकुमारांच्या प्रसादाच्या योगाने तरूण झाला.  या उपकारांची फेड करण्याकरितां हा आपल्या श्वशुरगृही गेला व याने त्याजकडून एक मोठा यज्ञ करवून त्या यज्ञांत अश्विनीकुमारांस हविर्भाग देऊं लागला.  पण ही गोष्ट इंद्राला पसंत न पडून त्याने च्यवनास मारण्याकरितां वज्र उगारतांच च्यवनाने त्याच्या नाशार्थ मद नामक राक्षस उत्पन्न केला.  त्यास पाहतांच इंद्र घाबरला, व त्या गोष्टीला कबूल झाला.  या वेळेपासूनच अश्विनीकुमारांस यज्ञांत हविर्भाग देऊं लागले.  एकदा च्यवनाने प्रयाग क्षेत्रीं उद्वास व्रतास आरंभ केला.  हा रात्रंदिवस पाण्यांत जाऊन बसे व सर्व मासे याच्या भोंवतीं जमा होत.  एका प्रसंगीं कांही कोळ्यांनीं मासे धरण्याकरितां जाळें लाविलें.  तें बाहेर काढतांच माश्यांबरोबर च्यवनही बाहेर आला; तेव्हां सर्व कोळी घाबरून जाऊन ते राजा नहुषाकडे गेले.  राजाने ऋषिची षोडशोपचारें पूजा करून तुम्हांस काय पाहिजे तें मागा असे तो म्हणाला.  तेव्हां च्यवन म्हणाला, `माझी योग्य किंमत करून ती तूं या कोळ्यांस दे.` राजा आपले सर्व राज्य देण्यांस कबूल झाला, तरीं ऋषिची योग्य किंमत होईना.  तेव्हां गविजात नामक ऋषिने राजास गोधन देण्यास सांगितलें.  राजाने गाई देतांच हा अतिशय संतोषित झाला व याने नहुषास गोधनाची महती कथन केली.  आपल्या कुळांत पुढे भिन्न जातित्वाचा दोष उत्पन्न होणार, ही गोष्ट याला तपःसामर्थ्याने कळली व याला कारण कुशिकाचा वंश आहे, असे जाणून त्याच्या वंशाचा नाश करावा, या उद्देशाने हा कुशिकाकडे गेला व म्हणाला, `हे राजा, मला तपश्चर्या करावयाची आहे, करितां तूं आपल्या भार्येसह माझी अहर्निश सेवा कर.` राजाने हे ऋषिचे म्हणणें कबूल केलें.  नंतर च्यवनाने सुग्रास भोजन आणण्यास सांगून तें येतांच त्याचें जाळून भस्म केलें.  नंतर हा राजपर्यंकीं निद्रावश झाला, आणि राजा भार्येसह याचे पाय रगडीत बसला.  याप्रमाणें हा एकाच कुशीवर 21 दिवस निजला.  तोपर्यंत राजा कांहीही न खातां तिष्ठत होता.  21 दिवसांनंतर झोंपेंतून जागा होऊन हा एकदम पळूं लागला.  हा क्षणांत दिसे, क्षणांत नाहीसा होई; अशा स्थितींतही राजा याच्या मागें पळत होता.  नंतर च्यवन एकदम दिसेनासा होतांच राजा राजवाड्यांत परत आला व पाहतो तों च्यवन निजलेलाच.  कांही वेळाने हा जागा झाला व परत पुन्हां दुसऱ्या कुशीवर 21 दिवस निजला.  नंतर जागा होताच च्यवनाने रथाला घोड्याच्या ऐवजीं एका बाजूस कुशिकास व दुसऱ्या बाजूस त्याच्या भार्येस जोडलें; व आपण स्वतः हातांत चाबूक घेऊन त्यांस बडवीत अरण्यांतून रथ हाकूं लागला.  येणें प्रमाणें त्याने कंटाळावें,आपणांविषयीं तिरस्कार दाखवावा व मग आपण त्यास जाळून भस्म करावें म्हणून याने त्याचा नाना तऱ्हांनीं छळ केला, पण तो कांही हरेना.  सरते शेवटीं प्रसन्न होऊन याने त्या राजास `तुझ्या कुळांत ब्राह्मण उत्पन्न होईल` असा वर दिला व एक बाग निर्माण करून त्यास स्वर्गसुख दाखविलें.  याला मनुपुत्री आरूषीपासून और्व नामक एक पुत्र झाला.  याचा आश्रम गयेंत होता.  च्यवन हा एक उत्कृष्ठ वक्ता असून सप्तर्षींपैकीं एक होय.  याला प्रमति नावाचाही मुलगा होता हा भृगुगोत्री एक प्रवरही आहे.  हा मंत्रकार होता.  हा धर्मशास्त्रकार असून अपरार्क व मिताक्षरा या ग्रंथात याच्या धर्मशास्त्राचा उल्लेख आला आहे.  गोदानाच्या वेळीं म्हणावयाचे मंत्र, कुत्रा, चांडाळ, प्रेत, चिताधूम, मद्य, मद्यपात्र इत्यादिकांना स्पर्श झाला असतां घ्यावयाचें प्रायःश्चित्त, गोवधाबद्दलचें प्रायःश्चित्त इत्यादि विधी बद्दलचे याचे पुष्कळ श्लोक व सूत्रें या दोन्ही ग्रंथांत आलेलीं आहेत. भास्करसंहितेंतील जीवदान-तंत्राचा हा कर्ता आहे.  हेमाद्रि, माधवाचार्य व मदन-पारिजात या तीन ग्रंथांत याचे आधार आहेत. च्यवनभार्गवाचें स्थान अलबागेपासून सहा मैलांवर असलेल्या चौल (चंपावती) गांवीं होतें.
आप्नवान -- भृगुच्या वंशातील हा एक गोत्रकार आहे. 
और्व -- और्व ही भृगुच्या मोठ्या कुळाची शाखा असावी.  और्व हे गोत्र असल्याचा उल्लेख आहे. पंचविंशब्राह्मणांत दोन और्वांचा सन्मानाने उल्लेख आलेला आहे.
            च्यवन ऋषीची भार्या मनुपुत्री आरुषी, हिच्या पुत्राचें नाव ऊर्व.
1.    कृतवीर्य नावाचा एक हैहयवंशीय राजा होता.  त्याचे उपाध्याय भृगुकुलोत्पन्न होते.  कृतवीर्याने पुष्कळ संपत्ति दिली होती.  पुढे कृतवीर्याच्या वंशजांनां द्रव्याची टंचाई भासुं लागली.  तेव्हां त्यांनीं आपल्या उपाध्यायांकडे द्रव्याची मागणी केली.  कांहीनीं भीतीने कांहीं दिलें, व कांहीनीं जमिनींत पुरून ठेवलें.  एका ऋषीचें घर खणून पाहातां कांही द्रव्य सांपडलें.  त्या बरोबर कृतवीर्याचे वंशज संतापून गेले व भार्गव ऋषि शरण आले असतांही त्यांची कत्तल सुरू केली.  इतकेंच नव्हे तर गर्भाचाही नाश सुरू केला.  तेव्हां भयामुळें भृगुवंशातील स्त्रिया हिमालय पर्वतावर निघून गेल्या.  त्या जात असतां एका स्त्रीने आपला गर्भ गर्भाशयांतून काढून मांडींत ठेवला.  ही गोष्ट एका स्त्रीने राजास कळविली, तेव्हां हैहय त्या वंशाचा वध करणार तों, शंभर वर्षें मांडींत राहिलेला तो गर्भ बाहेर आला.  त्याच्या तेजाने ते क्षत्रीय नेत्रहीन झाले.  पुढे त्या आंधळ्या क्षत्रियांनीं और्वास प्रसन्न हो म्हणतांच त्यांस दृष्टी प्राप्त झाली.  हा मातेच्या उरूपासून उत्पन्न झाला म्हणून यास और्व असे नाव पडलें.
     मोठा झाल्यावरही  हैहयवंशीय राजांनीं आपल्या ज्ञातिबांधवांस त्रास दिला म्हणून याने त्यांच्या संहारार्थ तप चालविले.  पण पितरांनीं याला, आम्हांस मृत्यु यावा म्हणूंन आम्हीच हे अन्यायाचें कृत्य केलें, आम्ही मेल्याबद्दल तूं क्रोधाविष्ट होऊं नकोस म्हणून सांगितलें.  तेव्हां पितरांच्या समाधानार्थ याने आपला क्रोधाग्नि समुद्रांत सोडिला.  वरील कथा पराशराला राक्षसांच्या नाशापासून परावृत्त करण्याकरितां वसिष्ठाने सांगितली.  याचें तप पाहून ब्रह्मदेवाने यास सरस्वतीकरवीं समुद्रंात टाकिलें व तेथें अग्नितीर्थ उत्पन्न झाले.
अयोध्याधिपति वृकपुत्र बाहु यास त्याच्या शत्रूंनीं-हैहय व तालजंघ यांनीं राज्यच्युत केल्यावर तो याच्या आश्रमापाशीं आला असतां मृत्यु पावला.  तेव्हां त्याची पत्नी सती जाऊं लागली.  पण ती गरोदर आहे असे पाहून तिला और्वने सती जाण्यापासून निवृत्त केलें.  पुढे ती सगर नावाचा पुत्र प्रसवली. या सगराला और्वाने अनेक अस्त्रांचें शिक्षण दिलें व रामाचें प्रख्यात आग्नेयास्त्र शिकविलें.  नंतर सगराने हैहय, तालजंघ, यवन या सर्वांस जिंकिंलें, तेव्हां वसिष्ठाने त्यांस राज्याभिषेक केला.  राज्याभिषेकाचे वेळीं हा आला व याने केशिनी, सुमति, प्रभा व भानुमती या सगराच्या पत्न्यांनां संतानवृध्दिदायक वर दिले.  याने सगराचा अश्वमेध केला. 
याचा पुत्र ऋचीक.  परीक्षितीस शाप झालेला ऐकल्याबरोबर जे ऋषि त्यास भेटण्यास आले होते त्यांत हा एक होता.  याचें नाव अग्नि असून ऊर्वाचा वंशज असल्यामुळें यास और्व असे नाव पडलें असावें.  तसेच याचा काळ जमदग्नीनंतर असावा.  याच्या नावाचा उर्वीवर म्हणजे पृथ्वीवर असणारा असा अर्थ असावा. और्व मध्यदेशांत राहिले व तेथेच त्यांची लग्ने झालीं, ही गोष्ट जमदग्नि गंगातीरीं राहात असे, अशा माहितीवरून दिसते.  पण `ब्रह्माण्डांत` हा नर्मदातीरीं होता असे दिसतें.  याने सगरास मदत केली.  पण रामायणांत भृगूने मदत केली म्हणून दिलें आहे.  हा शेवटचा और्व होय.  सगराने हैहयादिकांचा नाश केला असतां तो सर्व पराक्रम परशुरामाने केला असे म्हणतात. असे होण्याचें कारण और्वाने त्यास रामाचें आग्नेयास्त्र शिकविलें होतें हे असावें.  हा भृगुगोत्री असून मंत्रकार होता.
2.    याचा पिता भृगुवंशीय ऊर्व हा तप करीत असतां सर्व देव व ऋषि यास भेटण्यास आले.  नंतर ऋषींनीं यास विवाह करून प्रजोत्पादन करण्याची विनंती केली.  तेव्हां  "पत्नीशिवाय प्रजोत्पादन माझ्यासारख्या तपस्व्यास अशक्य आहे अशी या ऋषींची कल्पना आहे' असे वाटल्यावरून "हा पहा मी पुत्र उत्पन्न करितों, पण तो भयंकर होईल' असे याने ऋषीस बजावून सांगितलें; व आपली मांडी अग्नीत घातली.  नंतर एका दर्भाच्या काडीने तिचें मंथन करून त्या मांडीपासून एक पुत्र निर्माण केला.  त्याचेंच नाव और्व होय.  पुत्राबरोबर उत्पन्न झालेली माया ऊर्वाने हिरण्यकश्यपूस दिली.  हा जन्मल्याबरोबर खावयास मागूं लागला व याने जगताचा दाह करण्यास आरंभ केला.  या प्रमाणें तीन दिवस दाह केल्यावर ब्रह्मदेव येऊन त्याने ऊर्वाची प्रार्थना केली ;  व आपण जेथें राहतों त्या समुद्रांत या बालकास स्थान देण्याचें कबूल केलें व म्हणाला,. `मी व हा बालक युगांतीं सर्व पदार्थांचा नाश करूं ` असे कबूल केल्यावर हा और्वाग्नि आपलें तेज पितरांत टाकून समुद्रांत राहण्यास गेला. हाच युगांती प्रलयकारक, पातालांतील विषाग्नि, विष्णूच्या मुखांतून निघालेला व शंकराच्या तृतीयनेत्रांत राहणारा होय.  यास वडवामुख, वडवानल, संवर्तक व समुद्रप ही नावे आहेत.  हाच और्वाग्नि होय.  
3.    मालव (माळवा) देशांत राहणारा एक ब्राह्मण, यांचें नाव और्व होतें.  याच्या स्त्रीचें नाव सुमेधा, व मुलीचें नाव शमिका.  आपल्या मुलीचें याने शौनकाचा शिष्य व धौम्यसुत मंदार याच्याशीं लग्न लाविलें.  विवाहोत्तर कांही दिवसांनीं आपली स्त्री मोठी झाली असे जाणून तिला तो नेण्याकरितां और्वाच्या घरीं आला.  और्वाने दोघांस आनंदाने निरोप दिला.  मार्ग क्रमीत असतां वाटेंत तीं दोघें भृशुंडीस पाहून हंसलीं.  त्याबरोबर भृशुंडीने यांस "वृक्ष व्हा' असा शाप दिला.  त्याप्रमाणें हे वृक्ष झाले.  और्व  व शौनक शोध करीत असतां हे वृक्ष झाले असे त्यांस कळलें. तेव्हां त्यांनां फार खेद झाला. त्यांनीं देवाची आराधना केली. और्व अग्निरूपाने शमीवृक्षांत राहिला; व शौनक मंदाराची मुळी घेऊन त्याची गणेशाची मूर्ति बनवून तिचें पूजन करीत आश्रमीं राहिला. दोघांच्या अनुष्ठानांमुळें शमी व मंदार गणेशास प्रिय झाले.

जमदग्नि -- याचा ऋग्वेदांत अनेक वेळां निर्देश आला आहे.  यांत मित्रावरुण, अश्वी आणि सोम यांच्याशीं जमदग्नीचा संबंध दिसतो.  सौदासाच्या यज्ञांत वसिष्ठ पुत्र शक्तीने वादांत विश्वामित्राचा पराजय केला व त्याला यज्ञांतून हांकून दिलें.  तेव्हां जमदग्नींने सूर्यापासून ससर्परी नावाची, वाणीचें सामर्थ्य वाढविणारी विद्या आणून विश्वामित्राला दिली व त्याच्या कुलाची वृध्दि केली.  ससर्परी वाणी म्हणजे भाषणांतील कौशल्य.  जमदग्नीला या ठिकाणीं वयोवृध्द म्हटलें आहे.  पुढील वाङमयांतही हा विश्वामित्राचे बाजूचा असून वसिष्ठाच्या विरुध्द आहे; पण हरिश्चंद्राचे राजसूयांत विश्‍वामित्र होता, वसिष्ठ ब्रह्मा व जमदग्नि अध्वर्यु होते.  याने चतूरात्र नावाचा यज्ञ केल्यामुळें याच्या वंशांत कोणी दरिद्री निपजला नाही.  असित, अत्रि, कण्व व वीतहव्य यांच्याबरोबर याचा निर्देश आहे.  हा अक्षरब्रह्माचा उपदेश करीत असे.  वेदप्रचाराकरितां व ब्रह्माच्या उपदेशाकरितां इंद्राने याची योजना केली होती.  इतरही पुष्कळ ठिकाणीं याचा उल्लेख आहे.  हा मोठा तपस्वी होता.  जमदग्नि-भार्गवाचीं ऋग्वेदांत बरींच सूक्तें आहेत.
        हा भृगु कुलांतील ऋचीक नावाच्या ऋषीस गाधी राजाची कन्या सत्यवती हिच्यापासून झालेला पुत्र होय.  याच्या बापाचें नाव भृगु असेही आढळतें.  याला आर्चिक असे पैतृक नाव होतें.  रेणुका ही याची स्त्री होती.  तिच्यापासून याला रुमण्वानह्य, सुषेण, वसुमान्, विश्वावसु व परशुराम असे पांच पुत्र झाले.
        जमदग्नि हा अत्यंत रागीट होता.  एकदां हा लीलेने बाण सोडीत होता व ते बाण आणावयास रेणुकेस सांगत होता व ती वेळ कडक उन्हाची असल्यामुळें रेणुका दमली व विश्रांतीस्तव एका झाडाखालीं बसली.  त्यामुळें तिला बाण परत आणण्यास उशीर झाला.  तेव्हां याला राग येऊन याने तिला उशीराचें कारण विचारलें.  रेणुकेने उशीराचें कारण सांगतांच हा सूर्यावर संतापला व बाणाने सूर्यास वेधण्यास तयार  झाला. तेव्हा सूर्य याला शरण येऊन त्याने याला छत्री व पादत्राण दिलें.  याचप्रमाणें त्याने `मी तुझ्या उदरीं येईन` असे जमदग्नीस सांगितलें.  पुढें तो परशुरामाच्या रूपाने जमदग्नीच्या उदरी जन्मला.
        एकदा रेणुका सरोवरावर स्नानास गेली असतां त्या ठिकाणीं चित्ररथ किंवा चित्रांगद आपल्या भार्यांसह क्रीडा करीत होता.  त्याचें ऐश्वर्य पाहून तिच्या मनांत त्याच्याविषयीं अभिलाष उत्पन्न झाला व ती त्याची क्रीडा पाहात तेथेंच थोडा वेळ उभी राहिली.  त्यामुळे घरीं जाण्यास तिला जरा विलंब लागला.  परंतु तेवढ्यावरून हा फार संतापला व याने आपल्या पुत्रांस तिचा शिरच्छेद करण्यास सांगितलें.  परंतु परशुरामाशिवाय इतरांनीं याचें ऐकिलें नाही, त्यामुळें जमदग्नीने त्यंाचाही वध केला.  पुढे परशुरामाने आपल्या मातेचा शिरच्छेद केला तेव्हां प्रसन्न होऊन परशुरामास वर मागावयास सांगितलें असतां परशुरामाने वराच्या योगाने आपल्या मातेस व भावांस जिवंत करविलें.
        इतका जरी हा रागीट होता तरी पुढे पुढे हा अत्यंत शांत बनला.  एकदां हा खराच शांत बनला आहे कीं नाही हे पाहण्याकरितां क्रोध सर्परूपाने पितृ-तिथीचे दिवशीं याच्याकडे आला.  त्या दिवशीं जमदग्नीने श्राध्दाकरितां खीर केली होती, त्या खिरींत सर्परूप क्रोधाने आपली गरळ टाकली, परंतु हा सर्परूप क्रोधावर मुळींच रागावला नाही.  तेव्हां क्रोधाने याची स्तुति केली.  स्त्रीपुत्रादिकांच्या वधाचा विचार करतां जमदग्नीस पश्चात्ताप झाला व क्रोधामुळें हा अनर्थ झाला म्हणून याने क्रोध सोडला.
        जमदग्नीने गंगातीरीं एक हजार वर्षे तप करून इंद्रापासून कामधेनु मागून घेतली.  त्याच वेळीं इंद्राने यास एक दैदीप्यमान व ईश्वरांशभूत असा पुत्र होईल, असा वर दिला.  कश्यपाने याला षडक्षरमंत्र दिला होता.
        पुढे एकदां हैहय देशाचा राजा कार्तवीर्य हा ससैन्य जमदग्नीचे आश्रमास आला.  जमदग्नीने त्याचें कामधेनूच्या साहाय्याने उत्तम प्रकारें आदरातिथ्य केलें.  कार्तवीर्यास जमदग्नीच्या ऐश्वर्याचा हेवा वाटून त्याने कामधेनु बलात्काराने ओढून चालविली.  त्या वेळीं कामधेनूने आपल्या शरीरापासून बरेच यवन उत्पन्न करून त्यांच्याकडून कार्तवीर्याचा पराभव करविला.  पुढे कार्तवीर्याने जमदग्नीचे आश्रमाचा विध्वंस करून कामधेनु हरण करून नेली.  हे परशुरामास कळतांच त्याने कार्तवीर्यास ठार मारून कामधेनु सोडवून आणली.  पण कार्तवीर्यास ठार केलें, ही गोष्ट जमदग्नीस पटली नाही.  कार्तवीर्यपुत्रांनीं पित्याच्या वधाचा सूड घेण्याकरितां परशुराम आश्रमांत नाही हे पाहून, जमदग्नीस 21 बाणांनीं विध्द करून मारून टाकिलें.  पुढे परशुरामास हे कळतांच त्याने सर्व क्षत्रियांचा 21 वेळां निःपात करून जमदग्निवधाचा सूड घेतला.  कार्तवीर्यानेच जमदग्नीस मारल्याचाही कांही ठिकाणीं उल्लेख आहे.  वैवस्वत मन्वंतरांतील हा सप्तर्षीपैकी एक होता.  जमदग्नीने प्रथम श्राध्द सुरू केलें.  हा भृगुकुलांतील गोत्र व प्रवरही आहे.

                    वरील माहितीवरून जमदग्नि गंगातीरीं व और्व मध्यदेशांत राहात असत; गुजराथेंत नर्मदातीरावरील भडोच गांवी, परशुरामाने निःक्षत्रिय पृथ्वी केल्यावर अवभृत स्नान केलें, त्यावेळीं त्यास मंत्र सांगणारे, भार्गव ब्राह्मण राहात होते असे समजतें.  सध्यांही या नावाचे ब्राह्मण त्या प्रांतांत आहेत.  कोकणांत कुलाबा जिल्ह्यांतील चौल (चंपावती) येथें च्यवनभार्गवाचें स्थान होतें हे ही पुष्कळांस माहीत असेल.  यावरून  गंगातीरीं असलेले आर्य प्रथम नर्मदातीरीं आले व नंतर तेथून महाराष्ट्रांत (दंडकारण्यांत) आले असे म्हणतात त्यास ही माहिती विसंगत दिसत नाहीं.
                    भृगूपासून उत्पन्न झालेली ही कुलगंगा जामदग्न्यांपर्यंत कशी आली इतकी माहिती वर लहिल्याप्रमाणें, प्राचीन ग्रंथांवरून कळते.  त्यानंतरच्या काळांत या नदीचा प्रवाह कसा वाहात होता हे आज उपलब्ध असलेल्या माहितीवरून कळत नाही.  सरस्वती नदीप्रमाणें हिचा प्रवाह गुप्त वाहात होता, तो राजापूरचे गंगेप्रमाणें एकदम अर्वाचीन काळांत म्हणजे सुमारें साडेतीनशें वर्षापूर्वी--शक 1521 मध्ये-कोकणांत वाहतांना दिसूं लागला.
                    हा प्रवाहही फार जोराचा नाही.  एकंदर कोकणस्थांत हे भृगुकुल अल्पसंख्य आहे.  सवाशें वर्षांपूर्वी रास्ते यांनीं वाई येथें अग्रहारदानासाठी निवडलेल्या कोंकणस्थ ब्राह्मणांत इतर सहा गटांचे ब्राह्मण आहेत.  फक्त या भृगुगटाचे नांहीत तसेच विश्वविद्यालयाचे परीक्षेस बसणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या याद्या पाहिल्या असतां या गटांतील लोक फारच थोडे आढळतात.  ह्यावरून वरील विधानास पुष्टि येते.
                    गद्रे व अमरापुरकर यांनीं गोत्रमालका शक 1777त छापिली.  तींत कोंकणस्थांचीं 60 आडनावें दिलेलीं आहेत.  त्या साठांत काळे आडनाव नाही.  वत्सगोत्री आडनाव त्यांत एकच आहे व तें मालशे हे होय.   मार्तंड पृष्ठ 323 वर अथ षष्ट्युपनामचक्रं असे म्हणून 60 आडनावें दिलीं आहेत.  त्यांत काळे आडनाव दाखविलेलें आहे.
                    काळे आडनावामधून निघालेलीं आडनावें पुढील होत असे म्हणतात.  जोशी, उकिडवे, काकतकर, घाटे, सोहनी, घांगरेकर.

उपनावाची उपपत्ति
   काळे हे उपनाव निश्चितपणें अमुक एका कारणाने पडलें अशी माहिती उपलब्ध नाही.  वास्तव्याचें ठिकाण, वृत्ति व व्यवसाय, व्यक्तीविषयक गुण, सरकारदरबारीं हुद्दा इत्यादि नावें पडण्याचीं जीं कारणें आहेत त्यांपैकींच एखाद्या कारणाने काळे हे उपनाव पडलें असावें.  सकृतदर्शनी रंगावरून हे नाव पडलें असावें असे म्हणतां येईल.  काळ्यांचें मुख्य कुलदैवत काळभैरव आहे.  त्यावरून काळभैरवाचे उपासक ते काळे असेहि कोणी म्हणतात.  कोणाच्या मतें काळे आणि गोरे ही एकाच घराण्याचीं दोन नावें आहेत.  कारण कांही गोरे हे वत्स गोत्री आहेत.

गोत्र-प्रवर
  
ऋग्वेदात गोत्र शब्द अनेकदा आलेला आहे.  तिथे या शब्दाचे गायीचा गोठा, गायींचा कळप, मेघ, पर्वतश्रेणी, पर्वतशिखर, किल्ला, इ. अनेक अर्थ 
होतात. काही ठिकाणी गोत्र शब्दाचा समूह असा अर्थही घेतलेला दिसतो. छांदोग्योपनिषदात कुटुंब या अर्थी गोत्र शब्द आलेला आहे(4.4.1). यावरूनच त्याचा
पुढे एकाच वंशातले लोक असा अर्थ केला गेला. गो = भूमी व त्र = संरक्षक, यावरून भूमिसंरक्षक वर्ग असाही कोणी गोत्र शब्दाचा अर्थ करतात. त्यावरून आपल्या
भूमीच्या बाहेरची म्हणजे दुसऱ्या गोत्रातील मुलगी करणे किंवा पळवून आणणे, हाच पुरुषार्थ होय, अशा कल्पनेमुळे गोत्राबाहेर लग्न करण्याची प्रथाम रूढ झाली
असावी. बोधायनाने गोत्र शब्दाचा खुलासा दिला आहे, तो असा-
अर्थ - विश्‍वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ व कश्यप हे सात व आठवा अगस्त्य या ऋषींच्या अपत्यांना गोत्र असे नाव आहे. अशी गोत्रे हजार, लाख, कोट्यावधी आहेत. या मूळ आठ ऋषींना गोत्रकृत्, गोत्रकार, वृद्ध, स्थविर किंवा वंश्य असे म्हटलेले आहे. पुन्हा या प्रत्येक ऋषीच्या वंशात काही विशेष कर्तबगार पुरुष निपजले आणि त्यांच्या नावावरूनही त्या वंशाचे नाव प्रसिद्ध झाले. मग त्या पुरुषांची गणना मूळ गोत्रातच; पण स्वतंत्र गोत्रकर्ता म्हणूंन होऊ लागली. उदा. अंगिरस गोत्रात उत्पन्न झालेल्या कपी व बोघ यांच्या नावातून नवीन गोत्रे सुरू झाली. क्वचित पिता अज्ञात असेल, तर मातेच्या नावानेही गोत्र प्रसिद्ध होत असे. अशा रीतीने एका मूळ गोत्रात पुढे पुढे अनेक कीर्तिमान गोत्रकार उत्पन्न झाले. मग त्यांना गोत्रगण असे म्हणूं लागले. अशा प्रकारे मूळ आठ गोत्रे व प्रत्येकाच्या अंतर्गत उत्पन्न झालेल्या गोत्रगणांची सूची प्राचीन काळी तयार करण्यात आली. बौधायन श्रौतसूत्राच्या शेवटी अशी एक मोठी सूची दिलेली आहे, तिला महाप्रवरकांड असे नाव आहे. जेव्हा एखाद्याला एकाच पुरुषापासून आपल अखंडित वंशवृक्ष सांगता येतो, तेव्हा तो त्या गोत्रातील आहे, असे समजतात. जेव्हां एखादा पुरुष आपण जमदग्नी गोत्राचा असल्याचे सांगतो, तेव्हा त्याला मूळ जमदग्नीपासून आपली अखंडित वंशपरंपरा सांगता येते, असा त्याचा अर्थ होतो. मूळ आठ पुरुषांची जी अपत्ये त्यांना गोत्र आणि बाकीच्यांना गोत्रावयव असे म्हणतात. गौण अर्थाने गोत्र शब्द कुटुंबातील एखाद्या शूर, विद्वान किंवा श्रीमंत पुरुषाला लावतात आणि नंतर त्याच्या वंशजांना त्या पुरुषावरून नाव मिळते. या गोत्रांचे गणांत विभाग केलेले असून, गणांचे पुन्हा पक्ष नामक विभाग असतात. उदा. वसिष्ठ गणाचे उपमन्यू, पराशर, कुंडिन आणि वसिष्ठ असे चार पक्ष आहेत. त्याचेही पुन्हा असंख्य पोटविभाग आहेत. ब्रह्मविद्येचे पाठ देताना आचार्य शिष्यांना गोत्रनामांनी म्हणजे भारद्वाज, गार्ग्य, आश्वलायन, भार्गव, कात्यायन, इ. नावांनी हाक मारीत असत, असे उपनिषदांवरून दिसते. या वरून ब्राह्मणे व उपनिषदे यांच्या काळात गोत्रपद्धती दृढमूल झाल्याचे समजते. मात्र त्या काळीं गोत्राचा संबंध विवाहाशी जोडलेला नसून, तो यज्ञ किंवा अध्ययन यांच्या पुरताच मर्यादित होता. पण पुढे सूत्रकाळात गोत्राला अनेक बाबतीत महत्त्व प्राप्त झाले. उदा.-- 1) सगोत्रात म्हणजे समान गोत्रात लग्नसंबंध निषिद्ध मानला जाऊ लागला. 2) बेवारशी माणसाच्या संपत्तीचा वारसा त्याच्या जवळच्या सगोत्राकडे जावा, असे ठरले. 3) श्राद्धाचे ब्राह्मण शक्यतो यजमानाच्या गोत्राचे नसावे, असा निर्णय देण्यात आला. 4) प्रेताला उदक देतना त्याच्या गोत्राचा उच्चर करावा, असे ठरले. 5) चौलकर्मात गोत्राच्या आणि कुटुंबाच्या रूढीप्रमाणे शेंडी ठेवावी असे ठरले. 6) संध्या करताना स्वतःचे गोत्र, प्रवर, वेदशाखा व सूत्र यांचा उच्चार करावा, असे सांगितले गेले. 7) श्रौतकर्मात यजमानाचे गोत्र व प्रवर यांचा उच्चार करावा, असे सांगितले गेले. धर्मशास्त्रग्रंथ व पुराणे यांच्या गोत्रकल्पनेत मात्र फरक दिसतो. धर्मशास्त्रात ऋषींची म्हणजे पर्यायाने ब्राह्मणांची अपत्ये म्हणजे गोत्र होत, असे सांगितले आहे; तर पुराणांत क्षत्रिय राजे गोत्रकार होते व त्या क्षत्रिय गोत्रकार राजांच्या वंशात पुढे ब्राह्मण समाविष्ट झाले, असे म्हटले आहे. श्रीकृष्ण व पांडव ज्या सोमवंशात जन्मले, त्यांच्या एका शाखेत पुढे मधू, यदू, वृष्णी, इ. थोर पुरुष झाले. वृष्णीच्या नावावरून वृष्णी गोत्र उत्पन्न झाले. क्षत्रियवैश्यौ तु पुरोहितगोत्रपवरौ। क्षत्रिय व वैश्य हे पुरोहिताच्या गोत्रप्रवराचे मानावे, हे धर्मशास्त्रातील वचन अलकडचे आहे. त्याचा अर्थ क्षत्रियवैश्यांनीं नेहमीच पुरोहिताचे गोत्र स्वीकारावे, असा नसून, ज्या वेळी त्यांना स्वतःच्या गोत्राचे विस्मरण होते, त्यावेळी त्यांनी पुरोहिताचे गोत्रप्रवर स्वीकारावे, असा आहे. पूर्वी बटूचे उपनयन झाल्यावर तो गुरुगृही अध्ययनासाठी राहत असे. हल्लीचे पदवीधर जसे आपल्या विद्यापीठाची पदवी धारण करतात, त्या प्रमाणे पूर्वीचे स्नातक अध्ययनानंतर गुरुगोत्र स्वीकारून, मी अमक्या गुरुचा शिष्य आहे, असे सांगत. सांप्रत एका गोत्रातील लोक म्हणजे एका वंशातील लोक अशी समजूत आहे ती खरी नाही, हे यावरून कळून येईल. प्रवरकल्पना -- प्राचीन काळापासून प्रवराची कल्पना गोत्रकल्पनेशी निगडीत झालेली आहे. प्रवर म्हणजे गोत्रांचेही पूर्वज होत. ते एक, दोन, तीन वा पाच असतात. एखाद्या गोत्राचे तीन प्रवर असले तर ते प्रपितामह,पितामह व पिता असे असतात, असे मानलेले आहे. तैत्तिरीय संहितेत प्रवरांचा उल्लेख आहे. त्या वरून असे दिसते, की त्या वेळचे आचार्य श्रौतकर्म करणाऱ्या कोणत्यातरी संप्रदायात समाविष्ट होते. प्रवर शब्दातील वृ धातूचा अर्थ निवडणे, स्वीकारणे असा आहे. प्रवराला आर्षेय किंवा आर्ष असेही नाव आहे. आर्षेयवरण म्हणजे जे कर्मसंप्रदाय त्या वेळी होते, त्यापैकी एकाचा स्वीकार करणे होय. त्या वरून प्रवर हा शब्द संप्रदाय-प्रवर्तक ऋषींच्या नावाचा वाचक असून ते संप्रदाय श्रौतकर्मासंबंधीचे होते हे उघड आहे. गोत्र हा जसा विद्यावाचक शब्द आहे, तसा प्रवर हा कर्मसंप्रदायवाचक आहे. ऋषिभिः आर्षेयं प्रवृणीते अशी वचने श्रौतसूत्रांत येतात, त्यावरून वरील अर्थाला बळकटी येते. सूत्रकारांनी विशिष्ट गोत्रांचे विशिष्ट प्रवरऋषी सांगितलेले आहेत. उदा. पराशर गोत्राचे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंडिन गोत्राचे वसिष्ठ, मैत्रावरुण व कौंडिन्य आणि उपमन्यू गोत्राचे वसिष्ठ, भरद्वसू व इंद्रप्रमद हे प्रवर होत. मंत्रद्रष्ट्या तीन ऋषींचे आवाहन करायचे असल्यामुळे प्रवर ऋषींची संख्या मर्यादित झाली आहे. असे एकूण प्रवर 49 मानले आहेत.
एकार्षेया विशः वात्सप्रेति होता । (आप. श्रौ. सू. 24.10.16)

अर्थ - वैश्यांना वात्सप्र हा एकच प्रवर होता. बौधायनाच्या मते मात्र वैश्यांना भालंदन, वात्सप्र व मांक्तिल हे तीन प्रवर आहेत. काही गोत्रांच्या प्रवराविषयी सूत्रकारांत मतभेद आहेत. बौधायन सांगतो, की लौगाक्षी हे दिवसा वासिष्ठ आणि रात्रौ काश्यप आसतात. त्या मुळे दिवसा व रात्री त्यांचे प्रवर बदलतात. प्रवरांचा संबंध गृहकृत्यांशी जोडलेला असला, तरी मुख्यतः त्यांचा संबंध दशी व पूर्णमास या इष्टींशी येतो. सामिधेनी ऋचांचे पठण झाल्यावर होता यजमानाच्या प्रवरांचा उच्चार करत. हे प्रवर प्रपितामह, पितामह, पिता या क्रमाने उच्चारले जातात. त्यानंतर आज्याच्या आघार आहुती दिल्यावर अध्वर्यू पुन्हा एकदा यजमानाचे प्रवर व्युत्क्रमाने उच्चारतो. प्रवरांचा गृहकृत्यांशी संबंध सांगता येतो, तो पुढीलप्रमाणे - 1) वधूच्या व वराच्या पित्याचे प्रवर समान असता कामा नयेत. 2) उपनयनाच्या वेळी बटूच्या प्रवरांच्या संख्येइतक्या त्याच्या मेखलेला गाठी माराव्या. 3) चौलकर्मात शिखा ठेवताना मुलाच्या प्रवरांचा विचार करावा. प्रवरसूत्रांत वेगवेगळ्या गोत्रांच्या प्रवरांची यादी दिलेली आहे. क्षत्रिय आणि वैश्य यांच्या प्रवरांचाही त्यात उल्लेख आहे. बौधायन, आपस्तंब, सत्याषाढ (हिरण्यकेशी), मानव व कात्यायन ही प्रवरसूत्रे छापलेली आहेत. प्रवर म्हणजे त्या कुळातील पूर्वज ही कल्पना चूक असावी. प्रवर हे पिता, पुत्र व नातू यांची नामे दर्शवितात, असा समज आहे; पण तो बरोबर नाही. कुंडिन गोत्राचे प्रवर वसिष्ठ, मित्रावरुण व कुंडिन असे आहेत. यांच्या पैकी मित्रावरुण हा वसिष्ठांच्याही पूर्वकाळचा आहे, असे प्राचीन वाङ्मयातच सांगितलेले आहे. तेव्हा तो त्याचा मुलगा होऊ शकणार नाही. भारद्वाज गोत्राचे प्रवर भारद्वाज, बृहस्पती व अंगिरस हे होत. यातील बृहस्पती व अंगिरस हे पितापुत्र नसून, भाऊ-भाऊ होते, असे ऐतरेय ब्राह्मणात म्हटले आहे. एका गौतम गणात उचथ्य, वामदेव, रहूगण व बृहदुक्थ व तिसरा पुन्हा एकच म्हणजे गौतम आहे. चौघांचा पिता एकच असणे, यात काही वावगे नाही. पण चौघांचा मुलगाही एकच होता, हे म्हणणे कोणालाही पटणार नाही. यावरून गोत्र व प्रवर यांनी रक्तसंबंध दर्शविला जातो हे खरे नसल्याचे कळून येईल. प्रवर हे कुलातील पूर्वज नसून, निरनिराळ्या वैदिक शाखांचे अध्वर्यू असावे. मुलगा दत्तक गेला म्हणजे त्याच्या गोत्राबद्दल जे नियम पाळायचे असतात ते पाहिले तर प्रवर हे रक्तसंबंधांचे नसून विद्येसंबंधीचे होते, असेच दिसते.

--

 

विवाहसंबंध
     

गोत्र व प्रवर यांचा मुख्यत्वे लग्न ठरविताना विचार केला जातो.  सगोत्र विवाह म्हणजे एकाच गोत्रील व्यक्तींचा विवाह धर्मशास्त्राने निषिद्ध मानलेला आहे.  सगोत्राय दुहितरं न प्रयच्छेत्  समान गोत्रातील पुरुषाला कन्या देऊ नये, असे आपस्तंब म्हणतो.  सगोत्र विवाह केल्यास ती स्त्री चांडाळी व तिचा पुत्र चांडाळ होतो, असे काही स्मृतिकारांचे म्हणणे आहे.  सगोत्र स्त्रीशी विवाह करणे, हे गुरुतल्पगमनाइतके वाईट कृत्य आहे, असे धर्मशास्त्रकारांचे मत आहे. 
त्याचप्रमाणे असमानप्रवरैर्विवाहः = ज्या कुलांचे प्रवर समान नाहीत त्या कुलात विवाह व्हावा, असे गौतमसूत्रात म्हटले आहे.
सगोत्र विवाह का करू नये, याचे कारण ते पुढील प्रमाणे देतात-- वधू व वर या दोघांचे गोत्र एकच म्हणजे शांडिल्य असल्यास त्याचा अर्थ असा होतो, की या दोघांची कुळे सध्या कितीही दूरचीअसली, तरी शांडिल्य हा या दोघांचा एकच पूर्वज होता.  आणि ज्या दोन व्यक्तींचे पूर्वज एकच आहेत, त्यांचा परस्पर लग्नसंबंध हा त्यांच्या प्रजेच्या दृष्टीने अगदी घातुक आहे.
सगोत्राप्रमाणेच आणखीही काही गोत्रांचे आपसात विवाह निषुद्ध मानलेले आहेत. जामदग्न्य व वत्स, बाभ्रव्य व कौशिक, वसिष्ठ व कौंडिन्य, इ. गोत्रांचे परस्परांशी पटत नाही.  याचे कारण त्या दोन्ही गोत्रांचे सर्व प्रवर समान असतात किंवा एखादा तरी प्रवर समान असतो.  आणि प्रवर याचा रूढ अर्थ गोत्रकाराचेही पूर्वज असा असल्यामुळे, जी सगोत्रांची अडचण तीच सप्रवरांचीही होते.
सगोत्र, सप्रवर व सपिंड विवाहाचा हा जो निषेध सांगितला आहे, त्याच्या मुळाशी पुढील तीन कल्पना गृहीत धरलेल्या आहेत --
1)            गोत्राचे नाव रक्तसंबंधांमुळेच मिळालेले असते.
2)            प्रत्येक कुलाचे जे प्रवर सांगितलेले आहेत, ते त्या कुळातील पूर्वजच होते.
3)            कितीही पूर्वीच्या काळी दोन व्यक्तींचे पूर्वज एक होते असे ठरले, तर त्यांचा विवाह होणे, प्रजेच्या  दृष्टीने घातुक आहे.
ऐतिहासिक आणि शास्त्रीय पद्धतीने या गृहीत गोष्टींचा विचार केला असता असे दिसून येईल, की या तीन्ही गोष्टी असिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांचा निषेध मानण्याचे कारण नाही.
वेदकाळी सगोत्र विवाहाचा निषेध नव्हता; कारण त्या काळात गोत्रे व प्रवर हीच निश्चित झालेली नव्हती.  ब्राह्मण काळात प्रथमच ती निश्चित झाली. 
समाज लहान असतो, तेव्हा व्यक्तीचे एकच नाव उल्लेखाला पुरेसे असते.   पण समाज मोठा होऊन व्यवहार वाढला, म्हणजे निश्चितीसाठी कुलनामे देण्याची चाल पडते.  अशीच परिस्थिती ब्राह्मणकाळी निर्माण होऊन गोत्रनामे प्रचारात आली.  गोत्रे ही आडनावाप्रमाणेच असून आडनावाप्रमाणेच तीही निवासस्थान, धंदा, अध्ययन पध्दती, शाखा, धार्मिक मते, काही विशेष कर्तबगारी, इत्यादी वरून बनलेली असतात. गांधार, खांडव, गोदायन, सैंधव, पांचाल, इ.  गोत्रनामे देशावरून पडलेली आहेत. फडणिस, जोशी,कुलकर्णी, पुणेेकर, इ. उपनामे व्यवसाय किंवा निवासस्थान यांवरून पडलेली आहेत. त्या मुळे फडणिस असे नाव असलेल्या दोन्ही कुळांत रक्तसंबंध असेल, असे आपण मानीत नाही. काही वेळा तर त्यांची जातही भिन्न असते.  गोत्रांचीही हीच स्थिती आहे.
पूर्वी गोत्रे बदलता येत असत, असे शुनःशेप हा अंगिरस गणातून विश्वामित्र गणात गेला, त्या वरून कळते.  भारद्वाजाचा वंशज शौनहोत्र हा भृगुकुळात गेला व त्याने शौनक हे नवीन नाव धारण केले अशीही कथा आहे.
क्षत्रिय, वैश्य वगैरे जातींतील गोत्रे ही कुलगुरूंची गोत्रे आहेत, हे कित्येक ठिकाणी स्पष्टपणें दिसून येते. तेव्हा तिथे गोत्र हे रक्तसंबंध दाखविते, असे म्हणणेच शक्य नाही.
गोत्रातील लोकांनी आपसात विवाह करू नयेत हा आजचा नियम आठ ऋषींच्या वेळी अस्तित्वात नव्हता.  कारण कश्यप, वसिष्ठ व अगस्त्य हे मरीचीचे वंशज असून,काश्यप व वसिष्ठ यांमध्ये विवाह होतात.  आरंभीच्या शास्त्रकारांचीही सगोत्र विवाहाकडे पाहण्याची दृष्टी सौम्य होती.  सूत्रकाळी चांद्रायण
किंवा कृच्छ्र प्रायश्चित्त केले, की सगोत्र विवाहाचा दोष जात असे. मनूने सगोत्र विवाह नसावा, असे सांगितले असले, तरी तो करणाऱ्याला नुसते प्रायश्चित्तही त्याने सांगितलेले नाही.  याज्ञवल्क्य, नारद, पराशर व बृहस्पती या स्मृतिकारांनी मात्र त्यांना त्याज्य वाटत नाही.  यम, बृहद्‌यम व व्यास हे उत्तरकालीन स्मृतिकार मात्र त्या सगोत्र स्त्रीला चांडाली व तिच्या पुत्राला चांडाल असे समजतात.
गेल्या शंभर वर्षांत जीवशास्त्राच्या दृष्टीने या विषयाचा बराच अभ्यास झाला आहे.  या शास्त्राचे या बाबतीतले मत पुढीलप्रमाणे आहे --
व्यक्तीमध्ये काहीं गुण असतात व काही दोषही असतात.  अगदी जवळच्या रक्तात जर विवाह झाला, तर अंगी असलेले गुण प्रकर्षाने प्रगट होतात हा फायदा आहे; पण त्याबरोबर दोषही प्रबळ होतात, हा त्यातला तोटा होय. तेव्हा अगदी जवळच्या रक्त संबंधांत विवाह करू नये, हे इष्ट आहे.  पण सगोत्र व सपिंड विवाहाला मुळीच हरकत नाही.


                                                                                                                                                                                                                                       
 
 :-

"कुल संकल्पना"
	"    

"कुल"  म्हणजे गोळा करणे, एकत्र येणे या धातूवरून कुल शब्द झाला आहे. आप्तसंबंधाने एकत्र आलेले, एका रक्ताचे व संबंधी असे जेवढे लोक असतील त्यांचे मिळून कुल बनते. मराठीत ’घराणे’ हा शब्द कुल या अर्थाने वापरला जातो. कुल म्हणजे कुटुम्ब नव्हे किंवा जात नव्हे. "जात-कुळी" हा वापरातला शब्द जात व कुळ निराळे असल्याचेच दर्शवितात. कुलीन, कुलस्त्री, कुलवधू इ. शब्दांचा मूळ अर्थ "शुद्धवंश" असाच दर्शवितात.
कुल शब्दांत संबंधी व त्यांचे राहण्याचे घर या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. कुलाला हितकारक गोश्टीचा उपभोग क्कुळतल्या प्रत्येक व्यक्तीला घेता येतो.
तसेच कुलाच्या भल्यासाठी, किर्तीसाठी कांहीं कर्तव्य, जबाबदार्‍याही व्यक्तीला पार पाडाव्या लागतात.
"रघुकुल रीत सदा चली आयी। प्राण जाय पर वचन न जायी ॥" अशी वचन पालनासाठीच "रामायण" घडले आहे. एका कुलांत एकाच वेळी अनेक कुटुम्बे असू शकतात. तसेच गोत्र कुलापेक्षा मोठे असल्याने एका गोत्रांत अनेक कुले असतात.
कुल शब्द भारतीयांना अतिशय प्रिय आहे. कुलाच्या प्रतिष्ठेकडे त्यांचे लक्ष असते. कुलाच्या किर्तीसाठी व्यक्ति त्रास, कष्ट सोसून सत्कर्माला प्रवृत्त होते, तसेच निंद्य कर्मापासून वाढीसाठी उपकारकच ठरतो. पूर्वी सर्वदृष्ट्या यशस्वी कुलाला ’महाकुल’ म्हणत. वेदाध्ययन केलेल्या व त्रेताग्नि उपासना करणार्‍या कुलाला ’श्रोत्रीय कुल’ म्हणत. "श्रोत्रीयकुलाला" समजात उच्च स्थानीं मानत.
महर्षी मनू महाराज सांगतात-
"वेदाध्ययनाने व वेदार्थज्ञानाविषयीं आकांक्षा असण्यानें दरिद्री असलेली कुलेही उत्कृष्ट कुलामध्ये गणली जातात व मोठी किर्ती प्राप्त करून घेतात.
धृतराष्ट्रानें विदुराला ’महाकुल’ कोणत्या कुलाला म्हणावे असा प्रश्न केला असतां विदुर सांगतो- "तप, इन्द्रियदमन, तत्वज्ञान, अध्यात्म, द्रव्य, यज्ञ, पुण्यविवास, व सतत अन्नदान हे सात गुण ज्यांच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वसलेले असतात त्यांना ’महाकुले’ असे म्हणतात."
याच्या उलट जे कुल वेदाध्ययनाला पारखे झाले असेल किंवा सदाचाराचा परित्याग केला असेल त्याला "अकुल" किंवा "हीनकुल" म्हणत असत.



वत्सगोत्री काळे कुल --

 

     

आत्तांपर्यंत आपण गोत्र-प्रवर व कुल या संकल्पनांचा विचार पाहिला. या संदर्भांत आता "वत्सगोत्री काळे-कुलाचा" विचार करू.
"ऋषीदर्शनात्‍" अशी ऋषीशब्दाची व्याख्या आहे. म्हणजे ज्यानी ध्यानावस्थेत ’मंत्र’ पाहिले, चित्तात मंत्रध्वनी प्रत्यक्ष ऎकले त्यांना "ऋषी" म्हणावे.
अशा मंत्रदृष्ट्या पहिल्या विश्वामित्र, जमदग्नि आदि 8 ॠशींच्या नावाने गोत्रे व प्रवर प्रचलीत झाले आहेत.
वत्सगोत्र हे या आठांपैकी अग्निउपासक जमदग्नि ॠषींच्या कर्म संप्रदायात गणले जाते. वत्स गोत्राचे पांच प्रवर आहेत. भार्गव, च्यवन, आप्नुवान्‍, और्व व जमदग्नि असे पंचप्रवरान्वित ’वत्सगोत्र’ आहे.    अग्निदेवतेचे विशेषत्वाने आवाहन ज्यानी केले त्या ऋषींना ’प्रवर’ गणले जातात. पहिल्या आठ गोत्रामध्ये ज्या विशेष कर्तबगार अधिकारी व्यक्तिकालांतराने निर्माण झाल्या त्यांच्याही नावाने नवी गोत्रे प्रचलीत झाली. "वत्स गोत्र" हे अशाच रीतीने "वत्स आग्नेय" या ऋषींच्या नावाने प्रचलीत झाले आहे. हा सूक्त दृष्टा ऋषी आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील 187 क्रमांकाचे सूक्त याच्या नावावर आहे. "अग्नीस्तुती" हा या सूक्ताचा विषय आहे. या सूक्ताची देवता अग्नि आहे. "निर्मल, तेजयुक्त, राक्षससंहारक आणि कामपूरक अग्नि आमच्या शत्रूंचा नाश करतो." सारांश - वत्स गोत्री विशेषत्वाने अग्निउपासक आहेत. पंचप्रवरी म्हणजे इतर गोत्रीयांपेक्षा अधिक मात्रेने अग्निचे विशेष आवाहन करणारे ॠषी वत्सगोत्राचे आहेत. वत्सॠषी स्वत: अग्नि उपासकच आहेत. जमदग्नि ॠषींनी "चतूरात्र" नावाचा सोमायाग आपल्या कुलात कुणीही दरिद्री निपजू नये म्हणून केला होता. तो "जामदग्न चतूरात्र सोमयाग" नावाने प्रसिद्ध आहे. अशा अग्नी उपासनेचे फलस्वरूप "परशुरामासारखा" दुष्टांचे निर्दालन करून,पृथ्वी जिंकून निर्भय करणारा व तिचे विश्वजित सोमयाग करुन पृथ्वीचे, सर्वस्वाचे दान करणारा अवतारी पुरुष निर्माण झाला. परशुरामानेच अपरान्तीची म्हणजे कोंकण भूमीची समुद्र हटवून निर्मिती केली. व या अपरान्तात, कोंकणांत बाहेरून चित्पावन ब्राह्मण वैदिक, अग्नि-उपासक कुले(कुटुम्बे) आणून बसविली. त्यापैकीच वत्सगोत्री काळे कुल आहे. भगवान परशुरामानीं उत्तरेकडून ही वैदिक कुले आणून वसविली असे अनुमान करतां येते. कारण उत्तरभारतात 16 महाजनपदें होती. मगध, कोसल व वत्स ही विशेषमहत्वाची होती. वत्स प्रदेश अत्यंत समृद्ध असून तो तलम सुती वस्त्रासाठी प्रसिद्ध होता. कौशाम्बी ही त्याची राजधानी होती. यमुनेच्या तीरावर प्रयागपासून 30 मैलांवर "कोसम" नावांचे गांव आहे. तिथे ही प्राचीन नगरी होती असे संशोधकांचे मत आहे. काशीचा राजा दिवोदास याचा नातू ’वत्स’ याने आपल्या राज्याचा विस्तार करताना कौशाम्बीच्या भोवतालचा प्रदेश त्यांत समाविष्ट केला. त्यामुळे या प्रदेशाला ’वत्सभूमी’ हे नांव मिळाले. भारतीय युद्धांत काशीराजाच्या वत्सभूमितील सैन्यही पांडवांच्या बाजूने लढले. सध्याच्या "काशी" क्षेत्रातही "कालिया गली" नावाचा भाग आहे. या गल्लीत ’वत्सगोत्री काळे’ कुटुम्बे राहात. वत्स आग्नेय ॠषी व काशीचा राजा वत्स याच्या कौशाम्बी राजधानी असणार्‍या ’वत्स’ महाजनपदातून "वत्सगोत्री" वैदिक, अग्नि उपासक कुटुम्बे आणून भगवान परशुरामानी वसविली असे अनुमान करतां येते. अर्थांत या संबंधी पुष्कळ सखोल संशोधन करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेंच "काळे" आडनाव वत्सगोत्रीयामध्ये कसे रुढ झाले या विषयीही काही सांगता येत नाहीं. त्याचेही संशोधन होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत "वत्सगोत्री काळे कुल" हे प्राचीन कालापासून विशेषत्वाने अग्निउपासक कुल आहे हे निश्चयाने सांगता येते. त्यामुळें पुनश्च वत्सगोत्री काळे कुटुंबांना आपल्या गोत्राच्या, कुलाच्या, कुटुम्बाच्या उद्धारासाठीं, अकुलीनते पासून कुलीन, महाकुलीन, श्रोत्रीयकुलीन होण्यासाठीं वेदाध्ययन व अग्निउपासनेने अकुलीन स्थितीपासून श्रोत्रीयकुलीन स्थिती प्राप्त होवू शकते असे स्वानुभावाने सांगतां येते. भारतीय विश्वकोश, मराठी विश्वकोश, ऋग्वेद यांचे आधारे)